शुक्रवार, ५ एप्रिल, २०१३

दुचाकी लडाखायण … भाग - १२ …

                                         सकाळी  डी - झोजीला हॉटेल चा निरोप घेतला . सर्व समान घेऊन बाईक्स पाशी आलो…  बाईक्स वर समान बांधू  लागलो तसे  आमच्या आजूबाजूला हॉटेलच्या आसपासचे लोक जमा झाले … आम्ही त्या सगळ्यांचा  चांगलाच  मनोरंजनाचा विषय झालो होतो … मला डोंबारयाच्या  खेळाची आठवण झाली … लोक आमच्याकडे त्याच कुतूहलाने पाहत होते… हे समान लवकर बांधून होईल आणि इथून लगेच निघता येईल तर बरं  , असं  मला वाटू लागलं … शेवटी आमचं विंचवाचं  बिऱ्हाड घेऊन आम्ही निघालो…. सकाळचं  कोवळं  उन पडलं  होतं … वर निळंशार  आकाश …जमिनीवरचा रखरखाटपणा  जाउन  आता हिरवळ दिसू लागली … मोठमोठी झाडे अदबीने रांगेत उभी असलेली दिसत होती . अधून मधून काही  ' काश्मिरी कळ्या '   उमललेल्या दिसत होत्या …



                 कारगिलला येण्याआधी आणि तिथून निघताना वाटेत काही लहान मोठी गावं  लागली … त्यातल्या लहान शाळकरी मुलांची निराळीच सवय दिसली… आमच्या गाड्या  ज्या  ज्या गावातून जात होत्या त्या त्या गावातली लहान मुले आम्हाला  टाळ्या मारण्यासाठी  रस्त्यात आडवा हात पसरून उभी होती … सुरुवातीला आम्हाला वाटलं  कि लिफ्ट मागण्यासाठी हात दाखवत आहेत , परंतु नंतर  लक्षात आल्यानंतर आम्हीही उस्फुर्तपणे  त्यांना प्रतिसाद दिला … गोऱ्या  , लाल गालाची , गोबरी , लहान लहान मुले आम्हाला टाळ्या देण्यासाठी धडपडत होती …हे करताना  त्यांना भारी मजा वाटत होती,  असं  त्यांच्या हसऱ्या  चेहऱ्यांवरून कळत होतं … मी तर आडवा हात पसरूनच बसलो होतो … लहान मुले रांगेत उभे राहून  टाळ्या देऊ लागले … काही खट्याळ  पोरं जोरात फटका मारायची … एकाने तर कहर केला , हातात लहानसा दगड घेऊनच टाळी  देण्यासाठी तो उभा होता … त्याला लांबूनच नमस्कार केला अन सटकलो … उजवीकडे दुधासारख्या पांढर्याशुभ्र , खळाळत  वाहणाऱ्या नदीच्या सोबतीने निघालो… एके ठिकाणी रस्ताच्या कडेला नदीच्या बाजूला दगडाची मोठी आणि उंच भिंत उभारलेली आढळली …आणि तिथे एक बोर्ड लिहिलेला होता जो वाचल्यानंतर मानेवर बर्फाचा थंडगार खडा ठेवल्यासारखं ... अहं .... हा जुना वाक्प्रचार झाला....नविन वाक्प्रचार,  मानेवर डिओड्रंट स्प्रे मारल्यासारखं  वाटलं …!  बोर्ड होता - ' You are under enemy surveillance ...' '  दुश्मन आपको देख रहा है । '  संदीप म्हणाला , " ह्या भिंतीच्या आणि नदीच्या  पलीकडे डोंगरावर पाकिस्तानची चौकी आहे …त्यांना आपला  रस्ता दिसू नये म्हणून ह्या भिंती बांधल्या आहेत…"   सहज दोरी म्हणून दुर्लक्ष करावे आणि तोच जहरी नाग निघावा तसं  बाजूने खळाळत वाहणारी ती  नदी  ' लाईन ऑफ कंट्रोल '  आहे हे समजल्यावर  तिच्या  सौंदर्याचे  भीषणतेत  रुपांतर झाले …एकुणच कारगिल मधे येण्याअगोदर आणि त्यापुढे जात असताना एक प्रकारचा तणाव जाणवत होता. लेह लडाखचं स्वच्छ, मुक्त आणि आनंदी वातावरण या प्रदेशात कुठेतरी हरवुन गेलंय असं सारखं वाटत होतं... कारगिल चा इतिहास असेल किंवा इथे प्रत्यक्षात दिसत असलेल्या सैनिकांच्या चौक्या असतील , वातावरण संघर्षपुर्ण,  धामधुमीचं वाटत होतं... आता रस्त्याने जाताना हिरवी झाडे सोबतीला होती...  पुढे द्रास कडे कुच केलं. द्रास हे अतिशय थंड हवेचं ठिकाण.... तिथेच कारगिल युद्धाचं विजय स्मारक आहे... जणू शिस्तीने उभ्या राहिलेल्या हिरव्यागार झाडांमधून लांबवर आम्हाला विजय स्मारक दिसलं …



 
' ए वतन … ए वतन … हमको तेरी कसम …. ' , ' मेरा रंग दे बसंती चोला … ' अशी देश भक्तीपर गीते लावली होती …त्यामुळे आधीच भारावलेल्या वातावरणाला पार्श्वसंगीत लाभल्याने ते अधिक प्रभावी झाले होते … सैनिक सज्ज झाले होते . थोड्या वेळातच तिथे परेड सुरु होणार होती. आर्मीचा कोणी मोठा ऑफिसर तिथे भेट देणार होता … एकूणच वातावरण रोमांच आणणारं होतं … आम्ही तिथे पोहोचलो … अमर जवान च्या ह्या स्मारकावरील ओळी वाचल्या , आणि सर्रकन काटाच आला अंगावर …. !!!




आम्ही त्या स्मारकासमोर उभे होतो. एकूण १०९१ शहिदांची नावे त्यांच्या रेजिमेंटनुसार त्यावर लिहिली होती . हेच ते वीर ज्यांनी मातृभूमीसाठी कारगिलच्या होमकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली … त्यांचा सन्मान म्हणून त्या सगळ्यांची नावे स्मारकावर कोरली होती … विजय स्मारकाला  अभिवादन करुन आम्ही बाजुला असलेल्या कारगिल युद्धासंदर्भातील वस्तुंचे प्रदर्शन बघायला गेलो. सुरुवातीलाच हरिवंशराय बच्चन यांची ' अग्निपथ ' ही कविता लिहिलेली दिसली... वीररसाला साजेशी अशी ती कविता आहे ती...! प्रदर्शनात बॅटल ऑफ टोलोलींग, बॅटल ऑफ टायगर हिल ह्यांचे मॉडेल्स बनवलेले, युद्ध साहित्य , बॉम्बगोळ्याचे शेल्स ठेवलेले , कारगिल युद्धातील वीरांचे फोटो होते... ते पाहुन मी भारतीय आहे ह्याचा अभिमान वाटला.  इथे येणारा प्रत्येक जण मातृभुमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांपुढे नतमस्तक होतो... भारलेल्या डोळ्यांनी ते  प्रदर्शन पाहुन बाहेर आलो. त्यावेळी आर्मीचा तो बडा ऑफिसर तिथे आला … आमच्या पेहेरावाकडे बघून आम्ही बायकर्स आहोत हे त्यांनी बरोब्बर ओळखले . त्यांनी आमची आस्थेने विचारपूस केली … आमच्यात एक मुलगीही आहे हे समजल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि पियुची प्रशंसाही केली … लहानपणी घरात आलेल्या पाहुण्यांनी  चॉकलेट
देऊन कौतुक केल्यानंतर जसा होतो तसा आनंद
आम्हा सगळ्यांना झाला … तिथे दोन तीन सैनिकांशी बोललो.... " आप लोग कहॉं से है? " त्यातल्या एका सैनिकाने मला विचारलं.  "मुंबई " म्हटल्यावर त्याने स्मित केलं आणि म्हणाला " मुंबई और दुबई मे क्या फर्क है?  " मला कळेना तो असं का विचारत होता ते... " सरजी , मुंबई तो अपने देश मे है..." माझ्या उत्तरावर तो समजुतीने हसला. तो तसा का हसला हे मात्र कळले नाही … तिथल्या सैनिकांनी  कारगिल युद्धाबद्दल माहीती दिली ... " वो सामने पहाड दिख रहां है, वहॉं तक दुष्मन अंदर घुस आया था... " समोरची टेकडी आम्ही बघितली. ती फारतर २०० मीटर लांब असेल... त्यावर टोलोलींग असं लिहीलं होतं. आईशप्पथ....!  म्हणजे ' बॅटल ऑफ टोलोलींग 'ही आम्ही उभे होतो त्याच ठिकाणी झाली होती तर...!  प्रत्यक्ष युद्धभुमीत उभे होतो आम्ही...! " टायगर हिल यहां से कितना दुर है...? " आमच्यातल्या कोणीतरी विचारलं. " वो देखिये सामने टायगर हिल..." आम्ही बघीतलं ... ते शिखर इतकं दिमाखदार दिसत होतं की  त्या शिखराला दुसरं कोणतच नाव शोभलं नसतं... त्याला स्वतःचा वेगळाच असा सार्थ अभिमान होता.…




टायगर हिल काबिज केल्यानंतर आपल्या विजयी जवानांचा हाती तिरंगा घेतलेला फोटो असलेले टी शर्ट तिथे विक्रीस ठेवलेले होते,  ते आम्ही सर्वांनी घेतले. ते नुसते टी शर्ट नव्हते तर एकप्रकारचा बहुमान वाटत होता… , 'ताकद वतन की हम से है....' हे गाणं लागलं होतं .. खरंच ते किती सार्थ आहे हे तिथं गेल्याशिवाय कळणार नाही... भारावलेल्या मनाने आम्ही तिथुन निघालो. आज आम्हाला श्रीनगर गाठायचं होतं. बरंच अंतर कापायचं होतं … निघता निघता , " कर चले … हम फिदा … जानोतन सथियो …. " हे गाणं लागलं …. पावलं आपोआप जड झाली ….



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा